Cotton MSP : कापसाचा नवा हंगाम तोंडावर आहे. उत्तर भारतातील पंजाब, हरियाना आणि राजस्थान या राज्यांमध्ये नव्या कापसाची आवक सुरू झाली. -
September 20, 2023 Pune News : कापसाचा नवा हंगाम तोंडावर आहे. उत्तर भारतातील पंजाब, हरियाना आणि राजस्थान या राज्यांमध्ये नव्या कापसाची आवक सुरू झाली. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातही नव्या कपसाच्या लिलावाचा प्रारंभ झाला.
पण खरी आवक सुरू झाली ती पंजाब, हरियाना आणि राजस्थानमध्ये. या तीन्ही राज्यांमध्ये हमीभावापेक्षा जास्त भावाने कापसाचे व्यवहार पार पडत आहेत. सुरुवातीलाच हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने हंगाम जोमात सुरू झाल्यानंतरही हा भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे.
सध्या पंजाब, हरियाना आणि राजस्थान या राज्यांमध्ये नव्या कापसाची आवक वाढत आहे. पण सध्या प्रमाण कमी आहे. सध्या नव्या कापसाचे व्यवहार ७ हजार ४०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होत आहेत.
सरकारने यंदा लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार २० रुपयांचा हमीभावा जाहीर केला. तर जुना कापूस ७ हजारांपासून विकला जात आहे. देशाच्या इतर भागांतही हा भाव मिळतोय.
अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात ‘यूएसडीए’ने मागील तीन महिन्यांत सतत जागतिक कापूस उत्पादन, अमेरिका आणि भारताच्या कापूस उत्पादनात घटीचा अंदाज दिला. सप्टेंबरच्या अहवालातही मागील महिन्यातील अंदाजापेक्षा कमी उत्पादन राहील, असे म्हटले आहे. ताज्या अहवालात अमेरिकेच्या कृषी विभागाने जागतिक कापूस उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा ६ टक्क्यांनी घटेल, असे म्हटले आहे.
तर ऑगस्ट महिन्यातील अंदाजाच्या तुलनेत सप्टेंबरमधील अंदाजात अमेरिका आणि भारतातील उत्पादन आणखी कमी होईल, असा अंदाज दिला. आता जागतिक कापूस उत्पादनात भारत दुसऱ्या तर चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण या दोन्ही देशांमधील उत्पादन अंदाजात सातत्याने घट केली जात आहे.
दुसरे कारण म्हणजे देशातील दुष्काळी स्थिती. यंदा महत्त्वाच्या कापूस उत्पादन राज्यांमध्ये पावसाने दडी दिली. त्यातच देशातील कापूस लागवड यंदा सव्वातीन टक्क्यांनी कमी झाली. त्यामुळे सहाजिकच देशातील कापूस उत्पादन कमी राहील, असा अंदाज आहे. देशात किती कापूस उत्पादन होईल याबाबत देशातील उद्योग संघटनांनी अद्याप अंदाज दिला नाही. पण अमेरिकेच्या कृषी विभागाने अंदाज दिला.
पण ‘यूएसडीए’ने मागील दोन महिन्यांमध्ये भारतातील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी केला. मागील महिन्यातील अंदाजात ३२६ लाख गाठी कापूस उत्पादन होईल, असे म्हटले होते. पण चालू महिन्यातील अंदाज ३२० लाख गाठींपर्यंत कमी करण्यात आला. ‘यूएसडीए’ने मागील खरिपातील उत्पादन ३३२ लाख गाठींवर स्थिरावले होते, असे सांगितले.
दुष्काळी स्थितीमुळे उत्पादकतेत घट
मध्य भारत आणि दक्षिण भारतात दुष्काळी स्थितीमुळे उत्पादकता घटत आहे. तर उत्तर भारतासह देशभरात कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या बातम्या येत आहेत.
सध्या गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे प्रमाण कमी असले तरी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पंजाब, हरियाना आणि राजस्थान या राज्यांमध्ये ही समस्या जास्त आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव तेजीत आहेत. तर देशातही वायद्यांमध्ये कापसाला चांगला भाव मिळतोय.